Saturday, January 19, 2013

कर्नाटक मंदिर भ्रमंती(हळेबीड-बेलूर-शृंगेरी इ.)

This is more of travelogue than blog - this is on special demand by Ajay :)

मंदिर भ्रमंतीच म्हटली पाहिजे कारण आमच्या वास्तुविशारद परम मित्रांनी आखलेल्या ह्या ट्रीपमध्ये बहुसंख्य देवळांचा समावेश होता; तरी मी नाराजी दर्शवल्यामुळे शेवटी आटोपते घ्यावे लागले. :)

२७ डिसेंबरला सकाळी आम्ही निघालो NH4 ने दावणगिरीच्या दिशेने. थेट रानीबेन्नुरला थांबलो जेवणासाठी, तोपर्यंत ३ वाजून गेले होते. मेन रोडवरच स्टॅंडच्या पुढे डाव्या बाजूला छोटीशी खानावळ आहे - 'बसवेश्वर खानावळी'. ज्वारीची भाकरी आता इथून पुढे ४-५ दिवस मिळणार नाही याची कल्पना असल्याने २ घास जास्तच गेले! :)

इथून पुढे आमच्याकडे होता तो मित्राच्या वडिलांनी आखून दिलेला मार्ग आणि कर्नाटकचा नकाशा(कागदावरील, online नव्हे)! बहुसंख्य प्रवास याच्या आधारानेच केला.

पुढे हरिहरला जाण्याचा प्लॅन होता पण उशीर झाल्यामुळे कॅन्सल करावा लागला. थोड्या वेळाने दावणगिरी नंतर हायवे सोडून संतेबेन्नूर साठी उजवीकडे वळलो, पण चुकीचा रस्ता घेतला आम्ही; हा शॉर्टकट होता पण रस्ता पूर्णपणे खराब. याच्या थोडे पुढे एक state highway दिसत होता नकाशात, पण परत जाणे सुद्धा शक्य नव्हते. संतेबेन्नूर ला कसेबसे पोचलो तेव्हा साडेपाच होऊन गेले होते. आता इथून पुढे चन्नगिरी(Channagiri) ला जायचा रस्ता शोधत असताना डावीकडे काहीतरी पुरातन वास्तू दिसली आणि सगळे खुश झालो. तिथे गेल्यावर त्या रम्य संध्याकाळी पुष्करणीचा सुंदर देखावा बघून एकदम प्रसन्न झालो :)





काही स्थानिक लोक सोडले तर विशेष कोणी नव्हते त्यामुळे एकदम निवांतपणे फिरता आले. जवळची वास्तू म्हणजे मुसाफिरखाना आहे अस कळल. त्याच्या गच्चीवर जाऊन छान view मिळाला.

खूप वेळ रेंगाळत होतो पण बरंच अंतर जायचं असल्याने लगेच निघालो. इथून पुढे एक खूप चांगले लक्ष्मी-रंगनाथ मंदिर आहे असे कळले म्हणून गेलो पण निराशा झाली. तोपर्यंत अंधार पडलाच होता तरी सुद्धा शहाजी महाराजांच्या समाधीला भेट देण्यासाठी होदिगेरे(Hodigere) गावाचा शोध घेतला. अपेक्षेप्रमाणे हे स्मारक देखील तसे दुर्लक्षित होते. 
तिथून निघालो Channagiri मार्गे भद्रावतीला पहिल्या मुक्कामासाठी. Channagiri नंतर नकाशात जवळचा मार्ग दिसला म्हणून लगेच डावीकडे वळलो,पण नंतर लक्षात आले की शिमोगा मार्गे गेलो असतो तर पूर्ण हायवे होता, रस्ता चांगला असेल. मधला रस्ता बराच खराब होता. पण वाटेत एका तलावाच्या काठाला चंद्र आकाशात आला असतानाचा झकास देखावा मात्र हायवेला मिळाला नसता! 

पोचेपर्यंत ९ वाजत आले होते, थोड्या चौकशी नंतर 'पवन लॉज' मध्ये राहायचे ठरले. Descent आहे शहराच्या मानाने :) त्याच्या बाहेरच मेन रोड वर पद्म-निलय नावाचे हॉटेल आहे जिथे रात्री जेवलो आणि सकाळी नाश्ता पण केला. इथला प्लेन केक मस्तच होता! नंतर सुद्धा आठवण निघत होती सारखी!

दुसऱ्या दिवशी सकाळी Tarikere च्या अलीकडे बेंगलोर हायवेला 'Bhadra Wildlife Sanctuary and Dam' चा बोर्ड दिसला म्हणून आत शिरलो. तिथल्या ऑफिस मधून कळले की सकाळी ६ आणि संध्याकाळी ४ वाजता जंगल सफारी असते आणि नशीब जोरावर असेल तर वाघोबाचे दर्शन पण होते :) गवे पण असावेत जंगलात.

आता आलोच आहे इकडे तर जरा चक्कर मारावी म्हणून dam च्या दिशेने गेलो तर कळले की इकडे एक resort आहे. जाऊन बघितले तर अगदी धरणाच्या काठाला लागून ते resort आहे. इथला ambiance, view एक नंबर आहे!
 इथल्या जवळपास सगळ्या कॉटेज रूम मधून जलाशयाचा सुंदर view आहे! :)

ह्यांच्याकडे  १-२ दिवसाचे जंगल सफारीसह पॅकेज उपलब्ध आहे आणि resort एकदम छान आहे.. एकदम निवांत कोलाहला पासून दूर असे ठिकाण असल्यामुळे २ दिवस मस्त राहायला यावे असे वाटते! पण थोडे महाग वाटले.
अधिक माहितीसाठी ही लिंक बघा www.riverternlodge.com

इथून निघालो अमृतपुरा(Amruthapura) येथील अमृतेश्वर मंदिर पाहायला. होयसाळ शैलीतील हे मंदिर आहे बहुधा. विकी वर माहिती आहे. खूप छान मंदिर आहे. इकडे आवर्जून जाणवलेली गोष्ट म्हणजे या सर्व ठिकाणांना पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषित केल्यामुळे त्यांची एकदम नीट काळजी घेतली जाते.
इथून पुढे एक से एक मंदिरांच्या कारागिरीचे नमुने बघायला मिळत होते! इतके नाजूक आणि सुबक काम तेही इतक्या तपशीलासह एका सलग दगडात पाहून विश्वासच बसत नव्हता! इथल्या कारागिरीचे वर्णन शब्दात करणे अशक्यच आहे!
बारीक सारीक तपशील आणि symmetry बघून नुसते अवाक झालो!

छतावर एके ठिकाणी नटराजाची मूर्ती आहे. खूप अंधार असल्यामुळे नीट फोटो घेता आला नाही. (SLR ची गरज सारखी वाटत होती :) )
त्यानंतर आम्ही निघालो हळेबीड-बेलूरच्या दिशेने. हळेबीडच्या आधी Belavadi साठी एक फाटा लागला, थोडेसे आत जावे लागते पण नृसिंह मंदिर खूप छान आहे.


मला वाटते कृष्णाची इतकी सुंदर मूर्ती मी अजून पाहिली नाही आहे :)


                                      कोरीव काम तर सुंदर होतेच :)

ह्या मंदिरात आमच्याशिवाय कोणीच भाविक/पर्यटक नव्हते त्यामुळे शांतपणे बघता आले आणि पुजाऱ्याने सर्व माहिती पण नीट सांगितली.
सगळ्यात जास्त आवडलेले मंदिर!!! :)

त्यानंतर निघालो आम्ही हळेबिडू(अलीकडे बऱ्याच गावाना 'ऊ' प्रत्यय लागलाय कर्नाटकात) कडे. इथल्या जगप्रसिद्ध मंदिरात प्रचंड गर्दी होती, मोठ्ठ्या संख्येने शाळांच्या सहली पण होत्या.


 
अतिशय सुंदर मंदिर आणि खूप कोरीव काम असल्यामुळे गाईड घेणे अगदी आवश्यक आहे. २०० रु. घेतले आणि हिंदी मध्ये मंदिर तसेच महत्वाच्या शिल्पांविषयी माहिती दिली. पुढील माहिती गाईड ने दिल्या नुसार:
ह्या गावाचे मूळ नाव काहीतरी वेगळे होते, पण हे मंदिर बांधताना आणि नंतर खूप हल्ले झालेत त्यामुळे ह्याचे नाव हळेबिडू पडले, ज्याचा अर्थ 'भग्न गाव/जागा' असा आहे. अनेक हल्ल्यांमुळे बऱ्याचशा मूर्ती/शिल्पे विद्रूप केली आहेत :( आणि त्यामुळेच हे मंदिर पूर्ण होऊ शकले नाही. १०० हून अधिक वर्षे लागलीत आता जे मंदिर आहे ते बनायला.



होयसाळ घराण्याने हे शिवाचे मंदिर बांधले आहे त्यामुळे २ मोठ्ठ्या नंदीच्या मूर्त्या पण आहेत.
ह्या मंदिराची विशेषता की इथले बाहेरचे कोरीव काम खूप सुंदर आहे आणि रामायण-महाभारत इ. मधील प्रसंग इथे उतरवले आहेत. इथल्या शिल्पांमधील तपशील बघून थक्क व्हायला होत! हा दगड 'soap stone' आहे,जो सुरुवातीला मऊ असतो आणि नंतर उन-पावसामुळे कठीण होतो.
वरती जे डमरू दिसतंय त्याच्या वाद्या(strings) पण अगदी त्याच्या ताणासाहित दिसतात!

ह्या खालच्या शिल्पात कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आहे तो प्रसंग इतक्या तपशीलात आहे की त्या पर्वतावरील एक झाडावरच्या माकडाच्या हातात पाहीतरी फळ आहे ते पण दिसते! हे आणि असे अनेक चमत्कार बघून फक्त निःशब्द व्हायचं!



 ह्या नर्तकीचे तळपाय सुद्धा इतक्या तपशीलात आहेत की तिच्या नृत्यमुद्रेप्रमाणे पायाची ठेवण दाखवली आहे.

इथे राहण्याची सोय चांगली नाही अस कळल्यामुळे १५ किमीवर असलेल्या बेलुरला मुक्कामासाठी जायचं ठरवलं. संध्याकाळी पोचलो आहेच तर एक चक्कर टाकू आणि शक्यतो आज रात्रीच इथून निघू असा बेत होता. हे विष्णूचे मंदिर आहे आणि बहुधा होयसाळ घराण्याचे कुलदैवत आहे. हळेबीडच्या मंदिराशी शैलीत खूप साधर्म्य आणि साधारण एकाच कालखंडात बांधलय. हे मंदिर पूर्ण असल्यामुळे इथे पूजा-अर्चा चालू असते. आम्ही पोचलो तेव्हा मंदिरात सॅक्सॉफोन आणि Thavil वादन चालू होते! त्या धीरगंभीर वातावरणात इतकं भारी वाटत होत की सगळेजण एकदम trans मध्ये गेलो! त्यानंतर २ लहान मुलींचे भरतनाट्यम म्हणजे तर पर्वणीच होती. :) अविस्मरणीय संध्याकाळ होती!

राहण्यासाठी बऱ्याच लोकांनी सुचवलेले ठिकाण म्हणून Vishnu Regency शोधत गेलो पण इतके काही आवडले नाही. त्यामुळे Maurya(KSTDC approved) हॉटेल शोधले. सुविधा चांगल्या आहेत, पार्किंगचा प्रश्न नाही, पण इथल्या स्टाफला service हा शब्द माहीत नसावा! :) जेवण काही खास नव्हते.
सकाळी उठून मंदिरात जाण्याआधी एका छोट्या हॉटेल मध्ये भरपेट नाश्ता करून घेतला! काय काय ऑर्डर केलं होत काय माहीत! पण इकडे सगळीकडे डोसा, इडली-वडे खूप भारी होते. अशी कॉफी तर आपल्याकडे मिळणे अशक्य आहे(ह्या हॉटेल मधल्या कॉफीची झक्कास किक बसली होती). जेवण इतकं नाही आवडत पण. इकडच्या सोनकेळ्याना एकदम भारी चव होती, आम्ही तर त्यांना पेरू-केळीच म्हणायचो! :P
 
बेलूरच्या मंदिरासाठी गाईड घेतला आणि त्याने बरेच तपशील सांगितले जे आपल्या एरवी लक्षात येणे अवघड आहे. ह्या मंदिरात आतील कलाकुसर खूप छान आहे. एका नर्तकीच्या हातातील बांगडी गोल फिरवता येते म्हणे! 

काल जिथे गायन/नृत्य चालू होते त्या जागी एक सर्चलाईट लावला होता छतावरची कलाकुसर दाखवण्यासाठी!(त्याचे २० रु. वेगळे बर का :) ). इतकं बारीक नक्षीकाम बघून किती अवाक व्हायचं अस वाटत होत! 

खूप वेळ पाय निघत नव्हता खर तर इथून! 

नंतर आम्ही Mudigere मार्गे Kalasa(उच्चार 'कळसा' बहुधा) ला निघालो. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे इथून पुढचा प्रवासच बघण्यासारखा आहे! :) आणि थोड्याच वेळात ह्याचा अनुभव येऊ लागला. अचानक रुक्ष वातावरण बदललं आणि सगळीकडे झाडी दिसू लागली. वळणावळणाच्या रस्त्यातून जाताना थोड्या वेळाने कळल की कॉफीचे मळे आहेत दोन्ही बाजूस. मध्ये गाडी थांबवून एकदा बघून याव कसं दिसत कॉफीचं झाड म्हणून एक चक्कर मारून आलो! दुपारची वेळ होती आणि नुसती कॉफीची फळं बघून तहान-भूक भागत नव्हती, अशात आम्हाला 'कॉफी कॉर्नर' असा एक बोर्ड दिसला आणि ५-६ किमी नंतर एक छोटेसे टपरीवजा हॉटेल लागले. बहुधा हॉटेल-मॅनेजमेंट केलेला कोणीतरी उत्साही मुलगा असावा, त्याने कॉफी मळ्याच्या शेजारीच स्नॅक्स, कॉफी इ. साठी ते चालू केलय. छान view आहे आणि कोल्ड कॉफी तर लाजवाब होती(दुर्गा प्रेमींनी म्हणावं - याला म्हणतात कोल्ड कॉफी :D) कांदाभजी पण मिळाल्या! 
इथूनच थोडे पुढे 'Kelagur Coffee and Tea Estate' मध्ये स्थानिक मळ्यातील चहा-कॉफी इ. गोष्टी मिळतात. (घरी आणलीय कॉफी, चांगली वाटतेय :) )
आम्हाला Kalasa इथे पोचायला दुपार उलटून गेली होती. इथले मंदिर लाकडी आहे. 

आजूबाजूचा परिसर पण एकदम नयनरम्य आहे! सगळ्यांना विशेष वाटत होत की ह्या भागातली
घरे एवढी maintained कशी काय आहेत! एकदम छान आणि टुमदार:)

४:३० च्या दरम्यान त्या छोट्या गावात एक खानावळ वजा हॉटेल शोधले. जागा बघून इथे काहीच खायला नको अस वाटलं होत सुरुवातीला पण जेवण एकदम आवडल. चपात्या तर घरच्यासारख्या होत्या!

साधारण १० किमी वर होर्नाडू(Hornadu) इथे 'अन्नपूर्णेश्वरी मंदिर' आहे. रस्ता अतिशय खराब आहे. पण इकडे जायचेच असल्याने काही सुटका नव्हती :P 
अगदी आडमार्गी असले तरी राहण्यासाठी बऱ्याच सोयी दिसल्या. खूप लांबून भाविक येतात असे दिसत होते, पण आम्हाला काही खूप इंटरेस्ट नव्हता. :)

इथला मंदिराचा फोटो मात्र काढायचा राहिला.

इथून जायचे होते शृंगेरीला मुक्कामासाठी. अंतर तसे बरेच होते आणि घाटांचा रस्ता असल्यामुळे चौकशी केली आणि कळले की Balehonnur वरुन रस्ता बरा आहे. शृंगेरीला पोचेपर्यंत रात्र झाली होती. गावाबाहेरच एक मोठ्ठे हॉटेल आहे पण ते फुल्ल असल्यामुळे गावात चौकशी करत समजले की मठ/मंदिराच्या अगदी समोर भक्त निवास मध्ये चांगली सोय आहे, अगदी माफक दरात.

इथे पुरातनकालीन सरस्वती मंदिर आहे आणि अजून पण बरीच मंदिरे आहेत. त्याबरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे शंकराचार्य मठ आहे. 

इथे खूप सारे पालक आपल्या लहान मुलांना 'श्रीगणेशा' करण्यासाठी पाटी-पेन्सिल घेऊन आले होते. 
हे मंदिर नदीच्या काठावरच आहे आणि पलीकडे मठ आहे. चालत जाण्यासाठी पूल आहे, त्याच्या शेजारी लोक माशांना खायला घालत असतात त्यामुळे इथले मासे एकदम मोठे झाले आहेत! :)
 पलीकडे एकदम निसर्गरम्य वातावरणात गुरु-निवास आणि बरेच काही आहे.


मग निघालो आम्ही अगुंबे(Agumbe) घाटाकडे, इथून हवा स्वच्छ असेल तर कोकणचा देखावा दिसतो म्हणे! थोडा वेळ टाईमपास करून आम्हाला जायचे होते Thirthahalli मार्गे हुमचा(Humcha) येथील पुरातनकालीन जैन मंदिर बघायला. मुख्य मंदिर बहुधा नवीन आहे, पण थोड्या अंतरावर संरक्षित स्मारक असलेले जुने मंदिर आहे.
बरीच पडझड झाली होती पण परत restore करायचा प्रयत्न केलाय.


इथून निघालो 'सागर' जवळ 'Ikkeri' इथे. हे पण मंदिर पुरातनकालीन आहे.  


खरे तर इथपर्यंत माझा मंदिर बघण्याचा स्टॅमिना संपला होता त्यामुळे बनवासी(कदंब घराण्याची राजधानी) वगैरे ठिकाणांना जाण्याचा बेत रहित केला आणि जोग फॉल्सच्या जवळूनच हाय-वे ने कोकणात उतरलो, होनावरला. तिथून ३०किमी दक्षिणेला किनारपट्टीवरच मुर्डेश्वर आहे. तिथे मुक्कामासाठी गेलो.
घाट उतरल्या नंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे बेलूर-शृंगेरी साईडला खूप छान वाटत होते, आणि वेगळाच भाग वाटत होता. पण खाली किनारपट्टीला आल्यावर नेहमीची बजबजपुरी वाटू लागली!
मुर्डेश्वर मध्ये ३० डिसेंबरला राहायला मिळणे अवघड वाटत होते, पण सुदैवाने RNS residency(जे मंदिराला अगदी लागून, sea view असणारं भारी हॉटेल आहे) मध्ये सहाव्या मजल्यावर मस्त रूम मिळाली!
खूप प्रसिद्ध जागा आहे! इथे सगळ भव्य दिव्य आहे :) प्रचंड मोठ्ठी शंकराची मूर्ती, खूप उंच गोपुरम इ. 
गोपुरम मध्ये लिफ्ट ने जायचं असल्यास दुपारी ३ नंतर सोडतात अस ऐकल.


मुर्डेश्वर मध्ये अजून एक गोष्ट जाणवली म्हणजे इथे सबकुछ RNS आहे. कोणीतरी RN Shetty नावाचा बडा माणूस दिसतोय!

इथून निघालो आम्ही परत होनावर मार्गे गोकर्णच्या दिशेने. ४ पर्यंत पोचलो होतो, मग ओम बीच कडे जाण्याचा विचार आला(तिकडची काही रिसॉर्टस् चांगली आहेत अस ऐकल्यामुळे).
३१ डिसेंबर असल्यामुळे सगळी रिसॉर्टस् फुल्ल होती. मग असंच अगदी आतल्या बाजूला असलेले
रिसॉर्टस् शोधताना अंजनेय जन्मस्थाना जवळ एक भारी स्पॉट सापडला! सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे एकदम मस्त देखावा होता.
खूप छान हवा असल्यामुळे इथून पाय निघत नव्हता खर तर! 

आम्हाला  दमदार साथ दिलेल्या चौगुलेंच्या गाडीचा फोटो तर निघायलाच पाहिजे होता :)
इथे मागे काही गाड्या वगैरे दिसत आहेत तिथे एक कॅफे आहे. बराच वेळा क्षुधाशांती झाली नसल्यामुळे किमान कॉफी तरी मिळतेय का बघण्यासाठी गेल्यावर कळलं की तो कॅफे जर्मन लोकांनी चालवलाय आणि भारतीयांना अप्रत्यक्षरीत्या प्रवेश निषिद्ध आहे. आम्ही चौकशी केल्यावर अतिशय सभ्य शब्दात काहीतरी बहाणे बनवून indirectly सांगितलं की Indians are not welcome! ह्या भागात खूप युरोपियन/रशियन लोक दिसत होते आणि साहजिकच त्यांच्यासाठीची रिसॉर्टस्, कॅफे इ. 
भारतातल्याच एका भागात भारतीयांना प्रवेश नाकारला जातोय हे बघून अतिशय सुन्न झालो. गोकर्ण/ओम बीच चं मोर्जी(Morjim-Goa) होतंय, किंबहुना झालेच आहे अस वाटत होत.  
मग रात्री ८ च्या दरम्यान परत गोकर्ण गावात आलो. ३१ डिसेंबर मुळे धास्ती होती, पण थोड्याच प्रयत्नात रूम मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकर्ण बीच वर गेलो पण एकदम निराशा झाली. लोकांनी वाट लावून टाकली आहे बीचवर. अतिशय अस्वच्छ आहे.
नंतर इथल्या मंदिरात बाहेरूनच दर्शन घेतले! अंगारकी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती.

मग दुपारी परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीपर्यंत कोल्हापूरला पोचायचे होते. जेवणासाठी अंकोल्याच्या अलीकडे हायवे वर इंडियन ऑईलच्या पंपावर कामत रेस्टॉरंट आहे, तिथे थांबलो. जेवण छान आहे. इतके दिवस दाक्षिणात्य खाल्ल्यावर पंजाबी थाळी चा मोह आवरला नाही आणि खरंच चांगली मिळाली थाळी.

नंतर मग यल्लापूर मार्गे थेट हुबळी जवळ NH4 वर आलो. मधून काही शॉर्टकट आहेत पण हा रस्ता एकदम चांगला आहे.

बेळगावच्या आसपास सूर्यास्त होताना ढगाआड सूर्य लपला होता.

कलत्या सूर्यासोबत आम्ही पण परत निघालो होतो घरी, पुन्हा कधी अशीच भारी ट्रीप करायची या विचारात! :)

आम्ही  घेतलेला मार्ग इथे पहा. १-२ ठिकाणी नकाशा मध्ये शॉर्टकट दाखवला आहे पण शक्यतो मुख्य रस्ता/हायवे घेणे श्रेयस्कर.